पुणे: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथम दोन मुलांना गळफास देऊन त्यानंतर आई-वडिलांनी गळफास घेतला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुरूवारी रात्री घरातील एकाच अँगलला चौघेही गळफास लावलेल्या अवसस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
भारती विद्यापीठ परिसरातील सुखसागर नगरमधील अरिहंत इमारतीत राहणारे अतुल शिंदे (वय३३), पत्नी जया अतुल शिंदे (३२), मुलगा ऋग्वेद अतुल शिंदे (वय६) व मुलगी अंतरा अतुल शिंदे (वय३) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. अतुल याचा आयकार्ड बनवण्याचा व्यवसाय होता. अतुल व जया यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय त्यांच्याशी बोलत नव्हते, त्यामुळे ते सुखसागर नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. आई-वडिलांनी आधी मुलगा ऋग्वेद आणि चिमुकली अंतरा यांना फाशी दिली असावी. त्यानंतर पती-पत्नी यांनी गळफास घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून, त्यात म्हटले आहे की, पोलिसांनी कुणालाही दोष देऊ नये, परिस्थितीला कंटाळून आम्ही आमच्या मर्जीने स्वत:ला संपवत आहे, असे असल्याचे म्हटले आहे.