अंबाजोगाई: यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण कथा, कादंबरीकार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत लिखाण करणारे प्रा. भास्कर चंदनशिव, कळंब यांना घोषित करण्यात आला आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आंबेजोगाई येथील राजकारणी, समाजकारण, साहित्य, संस्कृती, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रात उतुंग कार्य केलेले स्व. भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी साहित्य, संगीत, पत्रकारिता, सुसंस्कृत राजकारणी, क्रीडा, सिनेमा- नाट्य, शिक्षण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एका मान्यवरास हा पुरस्कार स्वर्गीय भगवानराव लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो यावर्षी हा अकरावा पुरस्कार प्रा. चंदनशिव यांना दिला जाणार आहे.
भास्कर चंदनशिव यांचे शिक्षण व जडणघडण अंबाजोगाई येथेच झाली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गंगापूर, बीड येथील महाविद्यालयात त्यांनी मराठी अध्यापनाचे कार्य केले. त्याच बरोबर त्यांनी मराठी साहित्यात ग्रामीण कथा, कांदबरी, ललित असे वैविध्यपूर्ण लिखाण करून ग्रामीण साहित्यात नवा आयाम दीला आहे. त्यांच्या अनेक कथा व कादंबरी महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागलेल्या आहेत. त्यांची लाल चिखल ही कथा अनेक रूपाने वाचक व साहित्याचे अभ्यासक यांच्या मनात कायम कोरली गेली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक नामांकित पुरस्कार, त्याच बरोबर साहित्य संस्थांचे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या साहित्य सेवेची दखल घेवून मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद येथे पार पडलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार, रोख पंचवीस हजार रुपये असे आहे.
यापूर्वी हा पुरस्कार, यशवंतराव गडाख पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे, उल्हास दादा पवार, प्राचार्य रा. रं. बोराडे व पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. या वर्षीचा अकरावा पुरस्कार ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांना रविवार, १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, अंबाजोगाई येथे प्रख्यात साहित्यिक प्रा. राजन गवस कोल्हापूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. ही माहिती दगडू लोमटे यांनी दिली. या कार्यक्रमास सर्वां नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन, समितीचे सचिव दगडू लोमटे यांच्यासह, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा. सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतीश लोमटे, प्रा. प्रकाश प्रयाग, प्रा. भगवान शिंदे, प्रा. शर्मिष्ठा लोमटे व मार्गदर्शक भगवानराव शिंदे बप्पा आणि राजपाल लोमटे यांनी केले आहे.