# गावकुसाबाहेरचं जगणं अण्णा भाऊंमुळे साहित्यात -डॉ. विजय चोरमारे.

औरंगाबाद: अण्णा भाऊंचे साहित्य हे त्यांच्या जगण्यातून आणि अनुभवातून आलेले आहे. अण्णा भाऊंनी ग्रामसंस्कृती सोबतच गावकुसाबाहेरील भटक्या, वंचित लोकाचं कष्टमय जगणं पहिल्यांदाच साहित्यात आणलं, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत
डॉ. विजय चोरमारे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्रातर्फे शुक्रवार, ३१ जुलै रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ऑनलाईन व्याख्यान झाले. यामध्ये प्रख्यात साहित्यिक डॉ. विजय चोरमारे यांनी यांनी ‘अण्णा भाऊ साठे यांचे कार्य आणि साहित्याची प्रासंगिकता’ या विषयावर विचार मांडले. तर वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संजय शिंदे यांनी ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील फुले-शाहू- आंबेडकरी प्रेरणा’ या विषयावर व्याख्यान दिले कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी उद्घाटन केले. या केंद्राचे संचालक डॉ. डी. एम. नेटके व डॉ. कैलास अंभुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. राजर्षि शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचे ऑनलाइन सादरीकरण झाले. यावेळी डॉ. विजय चोरमारे म्हणाले, अण्णा भाऊंचे तत्त्वज्ञान त्यांच्या जगण्यातून आणि अनुभवातून आलेले आहे. सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून मूल्य प्राप्त व्हावे, त्याला आत्मभान यावे, आत्मसन्मान प्राप्त व्हावा ही त्यांची तळमळ होती. त्यांच्या साहित्यामध्ये केवळ दलित व कामगार जीवनाचे चित्रण येत नाही तर शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्ग, स्त्रिया, उपेक्षित या सर्वांचे चित्रण येते, असेही ते म्हणाले.

अण्णा भाऊंना एका विशिष्ट वादात बंदिस्त करणे अयोग्य ठरते. कारण त्यांच्या तत्त्वज्ञानात महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, मॅक्झिम गॉर्की, कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींच्या तत्त्वज्ञानाचा, विचारांचा समन्वय आहे. त्यामुळे ते व्यापक व वैश्विक पातळीवर जाते, असेही डॉ. चोरमारे म्हणाले.

ग्रामीण भागातील जीवन अत्यंत समृद्ध अशा भाषेत अण्णा भाऊंनी पहिल्यांदा मांडले, असे प्रा. संजय शिंदे म्हणाले. आज समाजातील धार्मिक भावना अत्यंत टोकदार बनल्या असून अशावेळी अण्णा भाऊ साठे यांचे परिवर्तनवादी विचार माणसांना जोडून घेऊ शकतात, असे प्रा. संजय शिंदे म्हणाले.

उद्घाटनपर भाषणात कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी म्हणाल्या, ग्रामीण जीवनातील अस्सल वास्तव मांडणाऱ्या अण्णा भाऊंच्या साहित्यात सामाजिक सलोखा जोपासला गेला आहे. साहित्य संपदेसोबत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णा भाऊंचे योगदान अनेक पिढ्या स्मरणात राहील, असेही त्या म्हणाल्या.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संजय शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ. कैलास अंभुरे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. दिगंबर नेटके यांनी आभार मानले.

उद्या शनिवारी वेबिनारचे आयोजन

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त शनिवार, एक ऑगस्ट रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे व गझलकार प्रा. मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई) हे विचार मांडणार आहेत. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली वेबिनार होणार आहे. सकाळी ११ ते १ या दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. डी. एम. नेटके व डॉ. कैलास अंभुरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *