मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले

जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज गुरुवारी १७ व्या दिवशी सोडण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी फळांचा रस प्राशन करत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारला काही दिवसांचा अवधी देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, राजेश टोपे, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर हे अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी फळांचा रस पिऊन आपल्या उपोषणाची सांगता केली.

यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या उपोषणस्थळी आले आहेत. मराठा समाजाला एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात, ही माझी भावना आहे. ते आज इथे आलेत म्हणून मी ही गोष्ट म्हणत नाही. पण ते आरक्षण देतील, हा माझा विश्वास आहे. शासनाची मागणी होती की, आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या. आपण त्या पद्धतीने एक महिन्याचा वेळ दिला आहे. ३१ व्या दिवशी सरकार आपल्या मराठ्यांना कुणबी दाखले देईल, असा विश्वास आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *