पुणे: ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी’… ,’नभ उतरू आलं’… ‘मी रात टाकली, मी कात टाकली.. मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली’… अशा एकाहून एक कविता, गीतांची रचना करणारे रानकवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.
ना. धों. महानोर यांचा जन्म पळसखेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते गावी परतले. मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.
एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध करणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार आहेत.
नामदेव धोंडो महानोर असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना. धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना होय. नव्या पिढीला ते आमदार होते हे सांगूनही खरं वाटणार नाही. पूर्वीच्या काळात महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना विधान परिषदेत सन्मानाने राज्यपाल नियुक्त करीत असत. ती सद्दी आता संपली असेच म्हणावे लागेल.