विद्यार्थी, पालक व तज्ज्ञांशी साधणार संवाद
छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ रोजी जिल्ह्यात येत आहे. सोमवार दि.२१ रोजी सकाळी साडेदहा वा. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात समिती विद्यार्थी, परीक्षार्थी व संबंधित घटकांना भेटून त्यांची मते जाणून घेणार आहे. या संदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व सज्जता करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सर्व आढावा घेतला.
राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा, तसेच परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत राज्यशासनाने गठीत केलेल्या भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती सोमवार दि.२१ रोजी जिल्ह्यात दाखल होत आहे. अपर मुख्य सचिव व्ही. राधा ह्या समितीच्या अध्यक्ष आहेत. तर वीरेंद्र सिंह, पोलिस महासंचालक सदानंद दाते, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डी.एन. रामास्वामी इ. समिती सदस्य आहेत. समिती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे परिक्षार्थी, अभ्यासिका चालक-मालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा पद्धतीबाबत सूचना मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांना भेटून चर्चा करणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात सकाळी साडेदहा वा. पासून सर्व संबंधित घटकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
०००००