नांदेड: कोरोना प्रतिबंधामुळे मागील पाच महिन्यांपासून राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत. मात्र, खासगी शाळांकडून ऑनलाईनच्या नावाखाली पालकांकडून फिस वसूल करण्यात येत आहे. या शाळांचे ऑडिट करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रा. डॉ. एस. एस. जाधव व सूर्यकांत कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. असे असले तरी राज्यातील खाजगी इंग्रजी शाळांनी ऑनलाईन एज्युकेशनच्या नावाखाली पालकांकडून फिस वसूल करण्यात आली आहे. असा प्रकार राज्यातील जवळपास 90 टक्के शाळांनी केला आहे. त्यामुळे फिस वसूल करणाऱ्या या शाळांचे 1 एप्रिल ते 20 ऑगस्टदरम्यानच्या या पाच महिन्याचे ऑडिट करण्यात यावे. तसेच यामध्ये दोषी आढळलेल्या शाळा चालकांवर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची प्रत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही पाठवण्यात आली आहे.